पोलीस अधिकारी रुळण्यापूर्वीच बदलीचा ‘नारळ’; तासगाव पोलीस प्रशासनात नेमकं चाललंय काय?
लोककल्याण न्यूज/ संतोष एडके
तासगाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या तासगाव तालुक्यात सध्या पोलीस प्रशासनातील अस्थिरतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एखाद्या अधिकाऱ्याने पदभार स्वीकारून तालुक्याची नस ओळखून कामाला सुरुवात करण्यापूर्वीच त्याची बदली केली जात असल्याने, “तासगाव पोलीस ठाण्यात नेमकं चाललंय तरी काय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

बदल्यांचा ‘झंझावात’ आणि प्रशासकीय गोंधळ
गेल्या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत तासगाव पोलीस ठाण्याने तीन पोलीस निरीक्षक पाहिले आहेत.
सोमनाथ वाघ यांच्या बदलीनंतर आलेले संग्राम शेवाळे यांनी जेमतेम तीन महिने काम केले.
त्यानंतर आलेले प्रदीप सूर्यवंशी तर अवघ्या ४१ दिवसांतच बदलले गेले.
आता विशाल जयसिंग टकले यांनी २६ वे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याला आपल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी टोळ्या, अवैध धंदे आणि राजकीय समीकरणे समजून घेण्यास किमान काही महिन्यांचा काळ लागतो. मात्र, अधिकारी रुळण्यापूर्वीच त्यांना बदलीचा ‘नारळ’ दिला जात असल्याने प्रशासकीय कामात मोठी खीळ बसताना दिसत आहे.
राजकीय संघर्षाचा पोलिसांवर दबाव?
तासगाव तालुक्यात आमदार रोहितदादा पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. किरकोळ वादातून होणारी हाणामारी, आंदोलने आणि सण-उत्सवांच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असते. अशातच, वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे नीर्यैर्य खचत असून, गुन्हेगारांवरचा वचकही कमी होत असल्याची भीती व्यक्त होत आहे.
”वारंवार अधिकारी बदलले की गुन्हेगारांना मोकळे रान मिळते. नवीन अधिकाऱ्याला परिस्थिती समजायला वेळ लागतो, तोपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढतात,” असे मत एका स्थानिकाने व्यक्त केले.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे लक्ष
या ‘संगीत खुर्ची’च्या खेळामुळे सामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत आहेत. तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला किमान स्थैर्य मिळणे आवश्यक आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पोलीस ठाणे हे केवळ ‘विश्रांती गृह’ ठरेल की काय, अशी उपरोधिक टीकाही आता होऊ लागली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या गोंधळावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
