पेढ्यांनीच घात केला असं म्हणायची वेळ येईल!”; रोहित पाटलांनी नेहरूनगरमध्ये विरोधकांना सुनावले; ‘अभद्र’ युतीवर जोरदार प्रहार.
संतोष एडके /लोककल्याण न्यूज तासगाव
येळावी जिल्हा परिषद गट, येळावी पंचायत समिती गण आणि वासुंबे पंचायत समिती गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेहरूनगर येथे भव्य सभा संपन्न झाली. या सभेत प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित दादा पाटील यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
.
सभेला संबोधित करताना शशिकांत शिंदे म्हणाले की, “तासगाव-कवठेमंकाळचे मतदार अत्यंत जागृत आणि सुसंस्कृत आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही स्वर्गीय आबांना घडवले, तसेच आज आम्हाला रोहित पाटील यांच्यात ‘प्रति आर.आर. पाटील’ दिसतात. आबांसारखीच बोलण्याची कला, तीच लबब आणि अभ्यासू धाडस रोहित पाटलांमध्ये आहे.” वयाच्या २६ व्या वर्षी युवा आमदार निवडून दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच, या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून दिल्यास सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आमदार रोहित पाटील हेच ठरवू शकतात एवढी ताकत आमदार रोहित पाटील यांच्या पाठीमागे उभी करण्याचे आव्हान केले या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर आ रोहित पाटील यांना पक्षाचे ‘युवक प्रदेशाध्यक्षपद’ देण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.
वचनपूर्तीचा धडाका आणि विकासाची ग्वाही
रोहित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने कशी पूर्ण केली, याचा पाढा शशिकांत शिंदेंनी वाचला. योगेवाडी एमआयडीसी, शेती पाण्याचा प्रश्न आणि उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे काम यातून रोहित पाटलांनी आपली ‘वचनपूर्ती’ सिद्ध केली असून लोकांचा विश्वास त्यांच्यावर अधिक दृढ झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

“विरोधकांच्या धमक्यांना घाबरत नाही” – आमदार रोहित पाटील
आमदार रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात विरोधकांना खडेबोल सुनावले. “सध्या विरोधक माझ्या कार्यकर्त्यांचे हातपाय तोडण्याची भाषा करत आहेत, पण त्यांच्यात तेवढी धमक नाही. भविष्यात त्यांना ‘ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी’ या पद्धतीने ठोस प्रत्युत्तर दिले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. मतदारसंघात झालेल्या विसंगत युतीवर टीका करताना ते म्हणाले, “एकमेकांचे कट्टर विरोधक आज पेढे भरवून एकत्र आले आहेत, पण निकालानंतर ‘पेढ्यांनीच घात केला’ असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येईल.”
उमेदवारांसाठी भावनिक साद
”ज्याप्रमाणे कामासाठी आमदार आपला असावा लागतो, तसेच ग्रामीण भागातील शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जि.प. आणि पं.स. सदस्यही आपलेच हवेत,” असे सांगत रोहित पाटलांनी डी. के. नाना पाटील (जि.प. उमेदवार), अजित पाटील (येळावी गण) आणि श्वेता रोकडे (वासुंबे गण) यांना निवडून देण्याचे आवाहन केले. “हे उमेदवार निवडून द्या, त्यांच्या कामाची जबाबदारी माझी राहील,” असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच येरळा नदी बारमाही करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
नंदीवाले समाजाप्रती कृतज्ञता
नेहरूनगर येथील नंदीवाले समाजाच्या योगदानाबद्दल बोलताना रोहित पाटील म्हणाले की, स्वर्गीय आबांच्या काळात या समाजाचे सर्व प्रश्न शासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी आबांना मोठे मार्गदर्शन आणि साथ दिली, ज्याची आठवण आजही कायम आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या सभेसाठी जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री डी के नाना पाटील, येळावी पंचायत समिती गणाची अजित पाटील, वासुंबे पंचायत समिती गणाच्या श्वेता रोकडे यांच्यासह माजी आमदार श्रीमती सुमनवहिनी आर. आर. पाटील, ज्येष्ठ नेते मस्के बापू, ताजुद्दीन तांबोळी, माजी जि.प. सदस्य संजय दादा पाटील, अनिल नाना पाटील, बाळासाहेब एडके, अमोल नाना शिंदे, बाळासो सावंत यांच्यासह येळावी, जुळेवाडी, निमणी, पाचवा मैल, नागाव, बेंद्री आणि वासुंबे परिसरातील प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
